
लोकशासन– प्रतिनिधी: संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
शहाजीनगर (ता.इंदापुर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी ऊस गळीत हंगाम सन २०२५-२६ साठी बसविण्यात येणाऱ्या मिल रोलरचे पूजन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि.२७) करण्यात आले.
नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना आगामी २५ व्या गळीत हंगामामध्ये ६ लाख मे. टन ऊसाचे गाळप करणार आहे. सदरचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली.
सध्या आगामी गळीत हंगामासाठी कारखान्यातील मशिनरीची कामे प्रगतीपथावर आहेत.आगामी गळीत हंगाम हा शासनाच्या धोरणानुसार वेळेवरती चालू होईल, याचे काटेकोर नियोजन करण्यात आलेले आहे. नीरा भीमा कारखान्याने गेली २४ वर्षात शेतकऱ्यांना नेहमीच चांगला दर दिलेला आहे.निरा भिमा ही शेतकऱ्यांच्या हिताची जोपासना करणारी संस्था आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी केले.
चालू वर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने ऊस लागणी मोठ्या प्रमाणात चालू आहेत. शेतकऱ्यांनी निरा भिमा कारखान्याकडे ऊस नोंद देऊन सहकार्य करावे, असे प्रतिपादनही भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.
नीरा भीमा कारखान्याची प्रतिदिनी सुमारे ६५०० मे. टन ऊस गाळप क्षमतेची ऊस तोडणी, वाहतुक यंत्रणा पुर्णपणे सज्ज झाली आहे.आगामी गळीत हंगामामध्ये ६ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण करणेसाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे व सहकार्य करावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे उपस्थित होते. प्रारंभी कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी स्वागत केले.