
लोकशासन–गणेश गुप्ते, उपसंपादक
भवानीनगर:(०३) जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून इंदापूर तालुक्यातील सणसर पंचायत समिती गणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या गणातून प्रज्ञा विजय चव्हाण यांनी अपक्ष उमेदवार म्हणून शड्डू ठोकल्याने सणसरमधील लढत आता रंगतदार वळणावर पोहोचली आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर त्यांनी उभं केलेलं हे आव्हान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
लोकसहभागातून विकासाचा अजेंडा
प्रज्ञा चव्हाण यांनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा करताना ‘लोकसहभाग आणि पारदर्शक कारभार’ या मुद्द्यांवर भर दिला आहे. सणसर गणातील प्रलंबित प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रचाराला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञा चव्हाण यांनी गणातील प्रत्येक गावात जाऊन गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः महिला वर्गाकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसतानाही, जनसामान्यांच्या बळावर ही निवडणूक लढवत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“सणसर गणाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे स्वप्न आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देऊन, सर्वसामान्य जनतेचा आवाज पंचायत समितीमध्ये पोहचवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी नक्कीच राहील.”
-प्रज्ञा विजय चव्हाण (अपक्ष उमेदवार, सणसर पंचायत समिती गण)