
लोकशासन- उपसंपादक गणेश गुप्ते,इंदापूर
इंदापूर: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सामान्य जनतेचे प्रश्न, महिला असुरक्षित, जनतेच्या मनामध्ये भय असे अनेक प्रश्न जैसे थे असताना महायुती सरकारच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करून भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे.
अशा कलंकित मंत्र्यांची मंत्रिपदावरून व लोकप्रतिनिधी पदावरून हकलपट्टी झाली पाहिजे ही जनभावना आहे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभरामध्ये व देश पातळीवर देखील चाललेल्या भ्रष्टाचाराबाबत व सरकारच्या चुकीच्या निर्णयाबाबत जनतेच्या मनातील जन आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्याच्या वतीने आज दि.(११) ऑगस्ट २०२५ रोजी शिवसेनेचे लोकप्रिय आमदार पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, उपनेते, प्रवक्ते सचिन भाऊ अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्यासह हे आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.
एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढत आहे सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढत आहे महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवून नेले जात आहेत पीक कर्जाचे नुसतेच आश्वासन दिले जात आहे यापूर्वी निवडणुकी अगोदर दिलेल्या आश्वासनांचा सत्तेत येताच महायुती सरकारला विसर पडला आहे पिक विम्यापासून शेतकरी वंचित आहे लाडक्या बहिणींना आता पैसे कमी करून देण्यात येत आहेत लाखो बहिणींना यापासून वगळून टाकले जात आहे दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बेताल वक्तव्य करणारे कृषिमंत्री, डान्स बार चालवणारे राज्य गृहमंत्री, रूममध्ये पैशांच्या नोटांचे बंडल बॅग मध्ये घेऊन बसणारे मंत्री, विधानभवनातील अन्नग्रहांमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण करणारे आमदार, मनो इच्छित कार्य करण्याकरता चुकीच्या पद्धतीने होम हवन करणारे आमदार,तसेच अन्य मंत्री यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतरही त्यांना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप जनतेकडून करण्यात आला असून त्यामुळे अशा मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर जन आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे.
त्याचबरोबर पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर आंदोलन करण्यात आले असून शिवसेना ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या मोठ्या उपस्थितीत आंदोलन पार पडले अशी माहिती शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय काळे यांनी दिली