
भवानीनगर:(१५)थंडीचा कडाका ओसरू लागला असून, सूर्यदेवाने आपले कडक रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील बागायतदार आणि जिरायतदार शेतकऱ्यांची ‘उन्हाळी’ हंगामासाठी मोठी लगबग सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्यांनी आतापासूनच कंबर कसली असून फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट पिकांच्या पेरणीवर भर दिला जात आहे.
कीड नियंत्रण: वाढत्या तापमानामुळे पिकांवर मावा, तुडतुडे आणि इतर किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच फवारणीचे कडक नियोजन करावे लागणार आहे.
पुणे मार्केट आणि मुंबईच्या बाजारपेठेला डोळ्यासमोर ठेवून भेंडी, गवार, कारली, दोडका आणि काकडी यांसारख्या वेलीवर्गीय भाज्यांची लागवड या महिन्यात शिखरावर असते.
दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात असलेल्या पुणे जिल्ह्यात मका आणि कडवळ यांची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे, जेणेकरून मे महिन्यातील वैरण टंचाई भासणार नाही.
शेतकऱ्यांनी ‘हे’ लक्षात ठेवावेच!
फेब्रुवारी महिन्यात पेरणी करताना केवळ घाई करून चालणार नाही. प्रशासनाने आणि कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
पाण्याचे नियोजन उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरींच्या पाणी पातळीचा अंदाज घेऊनच पेरणीचा आवाका ठरवावा. अर्धवट पिके सोडून देण्याची वेळ येऊ नये, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.
” बाजारात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट होण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्के बिल घेऊन बियाणे खरेदी करावीत”
–दिलावर तांबोळी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा उपाध्यक्ष