
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
भवानीनगर येथील प्रभाग एक भाग्यनगर मधील स्मशानभूमी जवळ वीज वाहकतारा व खांब वादळी वाऱ्याने पडल्याने गेल्या चार दिवसापासून ‘जैसे थे’परिस्थिती असून महावितरण लोकांच्या जीवाशी खेळत आहे का ?असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.

सध्या पावसाळ्याचे दिवस असून भवानीनगर- निंबोडी रस्त्याच्या कडेला असणारी स्मशानभूमी च्या काही अंतरावरच विज वाहक तारा व खांब पडलेल्या अवस्थेत आहे.आशा मध्येच अंत्यविधीसाठी येणारे लोकांच्या जीवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत भाग्यनगर मधील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या भागातील अनेक ग्रामस्थ गुरे, शेळ्या, मेंढ्या, गवताच्या शोधामध्ये या स्मशानभूमीच्या जवळच असलेल्या निलगिरी मध्ये येत असतात. अशातच गेल्या चार दिवसापासून वीज वाहक तारा व खांब पडल्याने याकडे महावितरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असुन एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यानंतर महावितरण जाग येणार का? असा सवाल नागरिक करीत आहेत.या वीज वाहकतारा व खांब त्वरित पूर्वस्थितीत करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.