
लोकशासन– प्रतिनिधी:संजय शिंदे, पुणे ग्रामीण
पुणे जिल्ह्यासह संपूर्ण दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
या परिस्थितीत तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीने बैठक घेऊन सर्वांनी सतर्क राहण्याच्या व नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश आमदार राहुल कुल यांनी दिले आहेत यावेळी प्रांताधिकारी श्रीमती वर्षा लांडगे मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बापूराव दडस, तहसीलदार श्री. अरुण शेलार, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, गोपाळ पवार, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती उज्वला जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता मयूर सोनवणे, हरिश्चंद्र माळशिकारे, तालुका कृषी अधिकारी श्री राहुल माने महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री. विकास आल्हाट निवासी नायब तहसीलदार श्रीमती ममता भंडारे मॅडम यांच्यासह सर्व मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.तालुक्यात सर्वदूर अवकाळी पाऊस झाला असून, स्वामी चिंचोली, खडकी, पाटस व दौंड परिसरात तुलनेत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
त्यांची संपूर्ण व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात यावी. पाणी साठल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या केलेली पेरणी वाहून गेल्या आहेत, त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे तो सुरळीत करण्यासाठी महावितरण चे प्रयत्न सुरु आहेत. ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे त्याठिकाणी वाहतूक बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाला देखील सूचना देण्यात आल्या असून, या परिस्थितीत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे व नागरिकांना आवश्यक सर्व सहकार्य करावे असे आदेश दिले आहेत.सर्व नागरिकांना देखील नम्र आवाहन आहे की सर्वांनी प्रशालनाला सहकार्य करावे.